मोठी बातमी! धनंजय मुंडेंचा राजीनामा, मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पदाचा राजीनामा सोपवला

मोठी बातमी! धनंजय मुंडेंचा राजीनामा, मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पदाचा राजीनामा सोपवला

मुंबई: बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात घडलेल्या संतोष देशमुख हत्याकांडाने संपूर्ण राज्यभर खळबळ उडवली आहे. या घटनेनंतर आरोपींविरोधात संतापाची लाट उसळली असून, या प्रकरणात नाव जोडले गेलेल्या सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट आदेश दिल्यानंतर अखेर मुंडेंनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

आज विधीमंडळ सभागृहाचे कामकाज सुरू होण्यापूर्वीच धनंजय मुंडे यांनी स्वतः उपस्थित न राहता, आपल्या पीए प्रशांत जोशी यांच्यामार्फत राजीनामा पाठवला. या घटनेने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, मुंडेंच्या राजीनाम्यानंतर पुढे काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरच राजीनामा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्रीच धनंजय मुंडेंना थेट राजीनामा देण्याचे आदेश दिले होते. ही चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत झाली. जवळपास दोन तास चाललेल्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत धनंजय मुंडेंना मंत्रिपद सोडण्याचे निर्देश दिले. त्यानंतर त्वरित राजीनामा लिहून घेण्यात आला आणि आज सकाळीच तो मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त करण्यात आला.

मुंडेंच्या निकटवर्तीयामुळे अडचणीत आलं मंत्रिपद?
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या वाल्मिक कराडचे धनंजय मुंडेंशी निकटचे संबंध असल्याचा आरोप विरोधकांनी वारंवार केला होता. कराड हा मुंडेंच्या निवडणुकीतील प्रमुख रणनीतीकार आणि व्यवस्थापक असल्याचे बोलले जात आहे. त्याला राजकीय अभय मिळाले असल्यानेच त्याने अनेक गुन्हे करूनही कारवाई टाळली, असा आरोप करण्यात येत आहे.

विरोधकांनी याप्रकरणी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली होती. आरोपीचा थेट संबंध मंत्र्यांशी असल्याने योग्य प्रकारे तपास होणार नाही, अशी भीती व्यक्त केली जात होती. अखेर हा दबाव सरकारवर वाढत गेला आणि मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घेण्याचा निर्णय घेतला.

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर आता पुढील राजकीय समीकरणे कशी बदलतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.